महाराष्ट्रात आज ४ हजार ९०९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६ हजार ९७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५ लाख ३१ हजार २७७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९०.४६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १२० करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६१ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या ९१ लाख २० हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९२ हजार ६९३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ९५ हजार, ६६६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ११ हजार ९६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात १ लाख १६ हजार ५४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९०९ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ९२ हजार ६९३ इतकी झाली आहे.

मुंबईत ७४६ नवे रुग्ण 

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ७४६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ९३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत मागील चोवीस तासात करोनामुळे १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत करोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५९ हजार ८६० इतकी झाली आहे. त्यापैकी २ लाख ३१ हजार ५४१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ३२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.