हजारो लोकांच्या समोर भाषण करतांना मी अडखळत आहे, मात्र मी बोलणार! केवळ बोलणारच नाही तर माऊंट एव्हरेस्ट ‘मिशन शौर्य २०१८’ ही मोहीम यशस्वी करून दाखविणारच, असा निर्धार छाया सुरेश आत्राम या १९ वर्षीय विद्यार्थीनीने व्यक्त केला. जगातील या सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्यासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांच्या निवडीची तसेच वर्षभर चाललेल्या खडतर व कठीण प्रशिक्षणाची कथा चित्तथरारक आहे.

आदिवासी विकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या १० विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने कूच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, आदिवासी विभागाच्या आयुक्त मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक राजा दयानिधी हे या मोहिमेचे खरे शिल्पकार आहेत. घरी अठराविश्व दारिद्रय़ असलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि रोहयोची कामे करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ आश्रमशाळांमधून शिक्षणाचे धडे देण्याऐवजी त्यांना नवीन काही तरी देण्याची कल्पना या शिल्पकारांच्या मनामध्ये रुजली आणि त्यातूनच मग मिशन शौर्य २०१८ माऊंट एव्हरेस्ट ही मोहीम जन्माला आली. यासाठी बोर्डा, देवाडा व जिवती या अतिदुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचीच निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेसाठी सात टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यात मोहिमेबद्दल माहिती व विद्यार्थ्यांची निवड केली. आश्रमशाळा बोर्डा, देवाडा व जिवती येथे जाऊन विद्यार्थ्यांना या मोहिमेची माहिती देऊन शारीरिक क्षमता असलेल्या ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ज्ञानभारती प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे पाच दिवसांचे प्राथमिक गिर्यारोहण प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेले २७ प्रशिक्षणार्थी जिल्हा क्रीडा संकुल येथे २५ दिवस जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शैक्षणिक सत्रासाठी त्यांना चंद्रपूरजवळील बोर्डा आश्रमशाळेत शैक्षणिक शिक्षण देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात रॉक क्लाइंबिंगमध्ये भोंणगिरी हैदराबाद येथे विद्यार्थ्यांना रॉक क्लाइबिंगचे २२ विद्यार्थ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. चौथ्या टप्प्यात हिमालयन पर्वतारोहण संस्थान दार्जिलिंग येथे प्रशिक्षण हिमालयन पर्वतारोहण संस्था दार्जिलिंग येथे २१ विद्यार्थ्यांना २१ दिवस प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी १४ हजार फूट उंचीवर गिर्यारोहणाचे व उंचीवरील वातावरणाशी समरस होण्याचे प्रशिक्षण घेतले. पाचव्या टप्प्यात हिमालयन पर्वतारोहण संस्थान दार्जिलिंग अ श्रेणी प्राप्त १३ विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुल येथे योग अभ्यासासोबत इतर बाबींचे २५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील लेह-लदाख येथे अत्यंत थंड -२५ तापमानात १३ विद्यार्थ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सहाव्या टप्प्यात शैक्षणिक सत्र परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी व आपत्कालीन स्थितीमध्ये करावयाचे उपाययोजनेबाबत ११ विद्यार्थ्यांना ३० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शेवटच्या व सातव्या टप्प्यांत अंतिम निवड झालेले १० विद्यार्थी शेरपा, डॉक्टर व इतर चमू सोबत १० एप्रिल रोजी ६० दिवसांच्या कालावधील माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले. या प्रशिक्षणाची फलश्रुती मिशन शौर्य मोहीम जून महिन्यात पूर्ण झाल्यानंतर होणार आहे.

आम्ही या मोहिमेसाठी निघालो असलो तरी कालपर्यंत आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना माऊंट एव्हरेस्ट काय आहे हे साधी माहिती नव्हते. दोन महिन्यापूर्वी कुणी तरी अधिकारी शाळेत आले आणि त्यांनी या मोहिमेची माहिती दिली. ही संधी सोडायची नाही, असे हा निर्धार मनात पक्का केला. मोहिमेसाठी निवड झाली. लेह येथे थंडीत आणि दार्जिलिंग येथे प्रशिक्षण सुरू असताना मोहीम सोडून परत निघाली होती. मोहीम अर्धवट सोडली तर प्रमाणपत्र मिळणार नाही आणि गावात पराभूत मानसिकतेने परतायचे नाही, असा निर्धार करून परत मोहिमेत सहभागी झाले आणि आज आम्ही सर्व जण माऊंटच्या दिशेने कूच करीत आहोत, हा आनंद शब्दात व्यक्त करताना मी अबोल झाली आहे. – छाया सुरेश आत्राम, शासकीय आश्रमशाळा, बोर्डा, चंद्रपूर</strong>

आम्ही गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो, घरात दोन वेळच्या जेवणाची बोंब असतांना मुला मुलींचे शिक्षण कसे करायचे हा प्रश्न होता. मात्र मनीषाला शिक्षणाची प्रचंड आवड. आज त्याच शिक्षणामुळे मुलगी माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराला गवसणी घालायला निघाली आहे. आम्हाला चंद्रपूर माहिती आहे. नागपूर आणि मुंबईची फक्त नावे ऐकली आहे. त्यामुळे ऐव्हरेस्ट काय आहे याची कल्पनादेखील नाही. मात्र मुलीचे शिक्षक, आदिवासी खात्याचे अधिकारी आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मुळेच मुलगी या मोहिमेत सहभागी होत आहे. आज आम्हाला मुलगी झाल्याचा सार्थ अभिमान आहे.   – धर्मा धुर्वे

या मोहिमेवर आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, कविदास काटमोडे, मनीषा धुर्वे, प्रमेश आडे, अक्षय आत्राम, उमाकांत मडावी, विकास सोयाम हे विद्यार्थी निघाले आहेत.