भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं आहे. “साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती” असं म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पद आणि पैशांसाठी कुणाशाही प्रतारणा केली नसती असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनी ट्विट करुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे नारायण राणे यांनी?
माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशांसाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती.  महाराष्ट्रातील आताचे सरकार हे नीतीमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते.

नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांचा इंदिरा गांधींना अभिवादन करताना फोटो ट्विट करत राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील का? असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवशक्ती भीमशक्ती आणि भाजपा यांची एकजूट तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात शिवसेना, भाजपा आणि रिंपाईने पुन्हा एकत्र येऊन एकजूट उभारली पाहिजे, ही खरी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.