जैन डायरीमध्ये नावाचा उल्लेख होताच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा माझ्याकडे दिला होता. मग आता राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदींचे उत्तर का नाही, असा खोचक सवाल काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी उपस्थित केला.शिवराज पाटील चाकूरकर यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. बसवराज पाटील आदी उपस्थित होते. नोटाबंदीपासून ते काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत नेमकेपणाने भाष्य करून त्यांनी विविध प्रश्नांवर अनेक वर्षांच्या कालखंडानंतर जाहीरपणे भूमिका मांडली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला आरोप चांगला की वाईट हा भाग वेगळा असला तरी यापूर्वी केवळ जैन डायरीत नाव आल्याच्या कारणाने अडवाणींनी दिलेल्या राजीनाम्याचा विसर भाजप नेत्यांना पडला आहे. चौकशी होण्यासाठी नेमलेल्या समितीने, न्यायालयाने क्लीनचिट दिल्यानंतरच पुन्हा ते संसदेत आले. मोदींना अडवाणींच्या या निर्णयाचा विसर पडलेला दिसतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नोटाबंदी करताना अंमलबजावणीची वानवा आहे. नव्या नोटा सामान्य जनतेपर्यंत नाही तर, धनदांडग्यांपर्यंत पोहचत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याआधीही सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही देशात ६ सíजकल स्ट्राईक झाले पण त्याची चर्चा नाही. खुद्द अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली कारगिलचे युद्ध जिंकले पण त्याचा गाजावाजा त्यांनी केला नाही. मग सíजकल स्ट्राईकची चर्चा आत्ताच का, असा सवाल चाकूरकर यांनी केला.