मुंबईत सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा पार पडला. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत किसान सभा तसंच संयुक्त कामगार-शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत शरद पवार तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सहभागी झाले होते. दरम्यान राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ भेट न घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यपाल शेतकरी नेत्यांना भेटले नाही या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही अशी माहिती मला मिळाली. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे”.

शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन!

अजित पवार यांना आपणास अनेक नेते भेटत आहेत त्यामुळे घरवापसी चर्चेला उधाण आलं आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जेव्हा कोणी येईल, घरवापसी होईल तेव्हा सांगेन, उगाच शिळ्या कढीला उत कशाला?”.

जयंत पाटील यांचा राज्यभरात दौरा सुरू आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, “इतर पक्षांच्या नेत्याप्रमाणे जयंत पाटील यांचे दौरे सुरू असून पक्षबांधणीच्या दृष्टीने दौरे केले जात आहेत”.

“कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले

सांगली कोल्हापूरमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमधील नेत्यांवर गुन्हे दाखल केले गेले. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे लोक असूदेत…आंदोलन करत असताना जे नियम अटी घालून दिलेल्या असतात त्यांचे पालन केले नाही तर पोलिसांना नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागतात”.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला न भेटल्याने त्यांच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी एकटवले होते. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होतं. मात्र राज्यपाल राजभवानात उपस्थित नव्हते, त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यावरुन राज्यपालांवर चौफेर टीका होत आहे.

शरद पवारांनी राज्यपालांवर काय टीका केली?
“तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी जोरादार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

राज भवनातून स्पष्टीकरण –
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गोव्याच्या विधानसभेत सोमवारी अभिभाषण होते. यामुळे ते मुंबईत आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, याची पूर्वकल्पना संयोजकांना देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राजभवनने दिलं.