पगडीच्या राजकारणावरुन शरद पवार यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होत असतानाच शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधकांवर निशाणा साधला. सध्या माणसामाणसांत मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पवारांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष येतात जातात, सत्ताही येते जाते, पण राज्य, देश आणि समाजहिताची जपणूक हे स्वप्न ठेवून पुढे गेले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. नंदु माधव दिग्दर्शित 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला' या संगीत नाटकाच्या टिळक स्मारक मंदिरातील प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी हजेरी लावली. यावेळी कलावंतानी शरद पवार यांचा महात्मा फुले पगडी घालून विशेष सत्कार केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, वास्तव चित्र समाजाच्या नव्या पिढीसमोर मांडण्याचे काम नाटकाच्या माध्यमातून केले जात असून सध्या लहानसहान गोष्टीतून माणसामाणसामध्ये मतभेद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते. तर ते रयतेचे राज्य होते. यासाठी कर्तृत्ववान महापुरुषांनी कष्ट केले आहे. त्यांनी इतिहास घडवला असून सत्ता येते जाते. पक्ष ही येतात जातात. पण राज्य देश आणि समाजहिताची जपणूक हे स्वप्न ठेवून पुढे गेले पाहिजे, असे ते म्हणालेत. नाटकाचे निर्माता भगवान मेदनकर, दिग्दर्शक नंदू माधवा गीत संगीत आणि संकल्पना संभाजी भगत लेखक राजकुमार तांगडे यांची आहे. मागील सहा वर्षात ७०२ प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे निर्माते भगवान मेदनकर यांनी ही माहिती दिली असून आजवर राज्यातील अनेक भागात प्रयोग झाले. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या प्रयोगाला शरद पवार हे पहिल्यांदाच उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. 'महात्मा फुलेंची पगडी पुण्यातच दिली' पुण्यातील कार्यक्रमात महात्मा फुले यांची पगडी घालण्याचा प्रसार केल्यावर त्यावर खूप चर्चा झाली. त्यावर एका कार्यक्रमात भूमिका देखील मांडली. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत. छत्रपती शाहू महाराजाची पगडी जनतेला घालता येत नाही. तर बाबासाहेबांनी कधी पगडी घातली नाही. महात्मा फुले यांनी समतेचा विचार दिला. त्यांच्या पगडीचा प्रसार केला आणि त्याच पगडीने माझा पुण्यात सत्कार करण्यात आला, असे पवार यांनी म्हणातच उपस्थितामध्ये हशा पिकला.