शिवसेना नेते नितीन नांदगावकराकंडून कराची स्वीट्सचं नाव बदलण्याच्या मागणीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराची एक दिवस भारताचा भाग असेल असा टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचं विलगीकरण केल्यास आम्ही स्वागत करु असं म्हटलं आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी कराची भारताचा भाग असेल ती वेळ येईल असं म्हटलं आहे. आम्हीदेखील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचं विलगीकरण करा असं म्हणत आहोत. जर बर्लिनची भिंत पाडली जाऊ शकते तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचं विलगीकरण का होऊ शकत नाही? जर भाजपा हे तिन्ही देश एकत्र करुन एक मोठा देश निर्माण करत असेल तर आम्ही नक्की त्याचं स्वागत करु,” असं नवाब मलिक यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

आणखी वाचा- आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीचं नंतर बघू; शिवसेनेचा फडणवीसांवर हल्ला

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली होती. कराची हे पाकिस्तानातील शहर असल्याने या शहराच्या नावानं भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं होतं. “मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणवार बोलताना म्हटलं आहे की, “आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल”. दरम्यान नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेससोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवेल असं सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले आहेत.