नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्री, नितीन गडकरी यांना पत्र नागपूर शहरात महिलांची लोकसंख्या १४ लाख आणि शौचालय केवळ ४७२ असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. अशीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात आहे. शौचालयांअभावी महिलांची होणारी कुचंबना लक्षात घेता नागपूरसह राज्यात महिला शौचालयांच्या संख्येत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून केली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भातील वृत्त लोकसत्ताने गेल्या आठवडय़ात प्रकाशित केले. त्याच वृत्ताचा आधार घेत गोऱ्हे यांनी हे पत्र लिहिले. साक्षरतेमध्ये आघाडीवर असलेले नागपूर शहर महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र फारच मागासलेले आहे. शहरातील महिलांची लोकसंख्या १४ लाख असताना स्वच्छतागृहांची संख्या ५६ हजार हवी. मात्र, ती जेमतेम ४७२ आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहासारखी मूलभूत गरज नागपुरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यत पूर्ण होत नसल्याचे विदारक चित्र आज सर्वत्र दिसत असल्याकडेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. वेकोलिच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा वेस्टर्न कोल फिल्डच्या खाणीत काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीवर चार आरोपींनी १४ ऑगस्टला बलात्कार केला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ ऑक्टोबर २०१४ रोजी याच वेस्टर्न कोलफिल्ड कंपनीत स्वच्छतेसंबंधी कार्यक्रम घेण्यात आले होते, परंतु महिलांसाठी सुरक्षित शौचालय उभारण्याचे काम मात्र येथे झाले नाही. त्यामुळे आज एक तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. यात दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे केली आहे.