वाहन परवान्याबाबत नवा नियम लागू

नागपूर : आता वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) एका वर्षांपेक्षा अधिक कालबा राहिल्यास तुम्हाला पुन्हा एकदा लर्निंग (प्रशिक्षणार्थी) परवाना काढण्याची प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर कायम परवान्यासाठी ३० दिवस अर्थात एक महिना प्रतीक्षा करावी लागेल. सध्या राज्यात परवाना संपलेले वाहन चालवताना पकडले गेल्यास ५०० रुपये दंड करण्याची तरतूद आहे. राज्यातील ५० आरटीओत हा नियम लागू झाला आहे. मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत महाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. याबाबत आरटीओ अधिकारी अभय देशपांडे म्हणाले, यापुढे परवाना संपून एक वर्षांहून अधिक काळ लोटलेल्या व नूतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जावर लर्निंग लायसन्सच्या अर्जाप्रमाणेच वागणूक दिली जाईल. याशिवाय कायम परवान्यासाठी एक महिन्याच्या प्रतीक्षेतही सूट मिळणार नसल्याचे देशपांडे म्हणाले. तर वर्षभऱ्याहून अधिक कालावधी लायसन्स कालबाह्य़ झाल्याला झालेले दिपक कुलकर्णी म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून सर्व नियमांचं पालन करुन मी गाडी चालवतोय. आतापर्यंत एकदाही माझ्यावर दंडात्मक कारवाई झाली नाही. पण, आता मला या नियमामुळे नवीन अर्जदार म्हणून वगणूक दिली जातेय. नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचालकांना नव्या नियमांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आता नव्या नियमांनुसार, मूळ स्थानाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत जमा करुन तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. अशाचप्रकारे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुमच्या मूळ पत्त्याचा  पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकणार आहे.