भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने महाराष्ट्र भाजपामध्ये मोठा भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे. “यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटतायतं याकडे लक्ष्य द्या, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आहे. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलण्याची गरज नाही, कारण त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ते स्पष्ट वक्ते आणि लढवय्ये आहेत. भाजपाची आणि आमची युती असताना सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी भाजपाची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन होते त्यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचा महत्वाचा वाट होता. खडसेंसारखा पाळंमुळं रुजवणारा माणूस ज्यावेळी पक्ष सोडतो तेव्हा मला असं वाटतं भाजपानं याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.”

आणखी वाचा- “दोर तुटला नाही, अस वाटलं होतं पण…” खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“पाया जर निसटला तर शिखरावरती पोहोचून उपयोग नाही. म्हणून शिखरावरती पोहोचताना पायाखालचे दगड का ठिसूळ होताहेत याचा भाजपानं विचार करायला हवा. भाजपापासून आम्ही बाजूला झालो, कालपरवा अकाली दलं बाजूला झालं. आता पक्षातील त्यांचे कडवट-कट्टर कार्यकर्ते ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची कुटुंबाची पर्वा न करता पक्षाची पाळंमुळं रुजवली ते सुद्धा जर सोडून जायला लागले तर याचा विचार त्यांनी करायला हवा. कधी काळी मी भाजपाचा मित्र होतो म्हणून हा मित्रत्वाचा सत्ता देतो आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला वेळच नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.