गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारने विकासावर भर दिला असून विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात तब्बल ७७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बनलेले व बनत असलेले रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन आज व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले. दिल्लीहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

या वेळी प्राणहिती नदीवरील निजामाबाद सिरोंचा असरअल्ली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील पूल (१६८ कोटी), इंद्रावती नदीवरील पातागुडम जवळील पूल (२४८ कोटी), लंकाशेनू येथील बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी यांना जोडणारा पूल (७.७१ कोटी), बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या राज्य महामार्गाची दुरुस्ती (२५.८१ कोटी), गारंजी पुस्तोला रस्त्याची दुरुस्ती (३५.६२ कोटी) या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

याशिवाय, पेरीमिली नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल (४३.२३ कोटी), बांडीया नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल (७२.५९ कोटी), पर्लकोटा नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल (७७.९८ कोटी), वैनगंगा नदीवरील तेलंगणा सीमा ते कोरपना, गडचांदूर, राजूरा, बाम्नी, आष्टी जोडणारा पूल (९८.८३ कोटी) या प्रकल्पांचे भूमिपूजन पार पडले.

आजच्या कार्यक्रमातील ७७७ कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अहेरी, भामरागड, लाहेरी आदी दुर्गम भागांमधील या रस्ते व पुलांमुळे पावसात या परिसराचा संपर्क टिकून राहील, वाहतूक अबाधित राहील, तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्थाही अधिक बळकट करता येईल. गडचिरोलीला विकासाच्या मुख्य धारेत आणून नक्षलवादाचा कणा मोडणे, याला सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते.