पुणे महानगरपालिकेने एक ठराव संमत केला असून, त्यांनी देशातील महिला शिक्षणाचे प्रणेते म्हणून समाज सुधारक जोडपे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करावा, अशी विनंती केली आहे.

समाज सुधारक जोडप्यास भारत रत्न घोषित करण्याचा केंद्र सरकारला आग्रह करण्याचा ठराव काँग्रेसचे नेते उल्हास बागुल यांनी सर्वसाधारण सभेत मांडला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकमताने तो मंजूर करण्यात आला आहे. हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल.

१८२७ मध्ये जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असताना अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. १८३१ मध्ये जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला शिक्षणाला चालना दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी या दोघांनी आपले आयुष्य वाहून घेतले. १८९७ रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले.

शोषित जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी जोतिरावांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. त्यांनी भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळादेखील सुरू केली.

सर्वसाधारण समितीत ठराव मांडणा पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते उल्हास उर्फ ​​आबा बागुल यांनी सांगितले की, समाज सुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली नागरी संस्था आहे.

आतापर्यंत, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याशी पुण्यातील नागरिकांचा भावनिक संबंध आहे. त्यांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. महानगरपालिकेने नागरी मुख्यालयाच्या आवारात ज्योतिराव फुले यांचे स्मारकही बांधले असून देशभरात विविध ठिकाणी या जोडप्यांची स्मारकं बांधली गेली आहेत.

सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती सुरू झाली आहे पण त्यांना भारतरत्न देण्यात आलेला नाही. “महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आता हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो राज्य सरकारकडे पाठविले जाईल जेणेकरून ते केंद्र सरकारला याची शिफारस करु शकतील. ” असे बागुल म्हणाले.