रायगड जिल्ह्यात पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यासाठी अलिबाग जवळच्या खानाव येथे ३४ एकर जागा देखील उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्यामुळे मोठी अडचण होत आहे. वैद्यकीय महाविद्यालय असावे असे रायगडकरांचे बऱ्याच वर्षांपासूनचे स्वप्न होते. सुनील तटकरे रायगडचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळवली होती. परंतू, राजकीय वादात ते बारगळले होते. अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी सहभागी झाले होते. या बैठकीत अदिती तटकरे यांनी अलिबाग नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे, या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी सूचना केली. वैद्यकीय संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करून भारतीय आयुर्विज्ञान परिषद तसेच केंद्र शासनाकडे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. उसर आणि खानाव येथील जमीन उपलब्ध "उसर येथील एमआयडीसीच्या ताब्यात असलेलेली ७ हेक्टर तर खानाव ग्रामपंचायत हद्दीतील ६ हेक्टर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. या जागेची मोजणी करून संरक्षक भिंत बांधण्याचे निर्देश दिले आहे. लवकरच भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे," अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. तर, "वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी हे महाविद्यालय उपयुक्त ठरेल. महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सक्षम होण्यास मदत होईल, अशी भावना आमदार मरेंद्र दळवी यांनी व्यक्त केली.