राज्यात मुंबई, अंबरनाथ, बदलापूरपासून जळगावपर्यंत अनेक ठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी असे चित्र अनुभवायला मिळाले.

राज्यात थंडीचा जोर वाढला असतानाच सोमवारी सकाळपासून पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रोहा, पेण, पनवेल या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर जळगावमध्येही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. डोंबिवली, पुणे येथे ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मंगळवारी आणि बुधवारी देखील तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तुरळक पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.