महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येणार का, या विषयावरील चर्चा आता थांबवा; नाहीतर माझ्याशी काही नेत्यांनी केलेली चर्चा उघड करावी लागेल, या शब्दांत राज ठाकरे यांनी सोमवारी युतीतील घटक पक्षांना फटकारले. 
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीच्या महायुतीमध्ये येणार का, हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यावरील एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी युतीतील घटक पक्षांवर हल्लाबोल केला. माझ्या पक्षामध्ये सगळे निर्णय मीच घेतो. त्यामध्ये बाहेरच्या कोणीही चर्चा करायची गरज नाही. माध्यमांनाही आता या विषयावर चर्चा करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. याच्यापुढे कोणीही या विषयावर चर्चा केली, तर माझ्याशी काही नेत्यांनी ज्या काही गोष्टींची चर्चा केली आहे, ती उघड करावी लागेल. असेही त्यांनी सांगितले.