राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून, त्यावर वेगवेगळी मत केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राम मंदिराच्या कामाविषयी भूमिका मांडली. राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज्यातील परिस्थितीविषयी राज ठाकरे एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "यात दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट राम मंदिर झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ही माझी आजची नाही, माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि ती मी जाहीर सभांमधून मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक त्याच्यासाठी गेले. त्याच्या खोलात जायची आता आवश्यकता नाही, त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही," असं राज म्हणाले. ई-भूमिपूजनाच्या प्रश्नावर राज म्हणाले,"म्हणूनच म्हणालो यात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मंदिर उभं राहिलं पाहिजे. आताच्या परिस्थितीत याचं भूमिपूजन व्हायला हवं का? तर मला वाटत आता ती वेळ नाही. लोक आता एका वेगळ्या विवंचनेत आहेत. काय आहे, भूमिपूजन होईल, एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. पण, यापलीकडे कोणीच त्या मानसिकतेत नाही. झालं आनंद आहे. खरं उभं राहिलं त्यावेळी जास्त आनंद होईल. मला आता कल्पना नाही, त्यांनी आता का ठरवलं. राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे. आता गरज नाही. दोन महिन्यांनी झालं असतं तरी चाललं असतं. कारण सगळं स्थिरस्थावर झालं असतं तर लोकांना आनंद घेता आला असता," असं राज ठाकरे म्हणाले.