एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या ठिकाणी त्यांनी पुराने नुकसन झालेल्या भागांची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपाचे १६ आमदार फुटणार अशीही चर्चा होती मात्र असे काहीही होणार नाही असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

“एकनाथ खडसे हे आमदार नाहीत. त्यांना तिथे आमदारकी मिळण्याची शक्यता आहे तसंच त्यांना मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जायला नको होतं. त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी चूक केली”