औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता शिवसेना नेत्यांमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून लावून धरला आहे. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खैरे यांनी रविवारी सांगितले होते. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपाकडून शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, यावरून आता राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंना फटकारले आहे.

शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी; शिवसेना घालणार मुख्यमंत्र्यांना साकडं!

‘खैरे दिल्लीत आहेत. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण हा साप साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा असा टोला कदम यांनी लगावला. निवडणुका आल्या की शहराच्या नामांतराचा मुद्दा जोर धरायला लागतो. तीन वर्षापासून केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र, नामांतराचा प्रश्न सुटलेला नाही. देशात अनेक शहराचं नामकरण करण्यात आलं. परंतु औरंगाबाद शहराचा समावेश त्यात करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रयासोबत १७ तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण हा मुद्दा मांडणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं होते. त्यावर हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. खासदार चंद्रकांत खैरे दिल्लीत असतात. त्यांनी त्यावर आवाज उठवावा. वेळ पडली तर वेलमध्ये बसावं. मात्र हा साप साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला नसेल तर तसं सांगावं, त्याबद्दल पाठपूरवठा केला जाईल असे रामदास कदम यांनी सांगितले.

भाजपाच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत- चंद्रकांत खैरे