राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करीत शिवसेनेचे धनुष्य हाती घेतलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपये देऊन मंत्रिपद घेतले, असा गौप्यस्फोट त्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावरून केला.

भाजपाच्या महाजनादेश यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. राज्याच्या विविध भागांतून ही यात्रा जात असून यात्रा बीडमध्ये आली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी टीका केली. ते म्हणाले, आमच्या काकांनी ५० कोटी रूपये देऊन मंत्रिपद घेतले. इतके पैसे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरा बदलला असता. सत्तेचा वापर संपत्ती जमवण्यासाठी केला म्हणूनच देशासह परदेशातही जयदत्त आणि भारतभूषण या दोन्ही भावांनी संपत्ती घेतली, असा आरोप त्यांनी केला.

हातातून घड्याळ काढून धनुष्य हाती घ्या, असे आवाहन शिवसेनेत प्रवेश करताना जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. याचा हवाला देत संदीप क्षीरसागर म्हणाले, अण्णा तुम्ही कार्यकर्त्यांना म्हणालात की घड्याळ काढून धनुष्यबाण हाती धरा. पण तुमचे वय आता ७५ झाले आहे. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या तुटतील. आम्हाला वानरसेना म्हणून हिणवता. तुमच्यासारख्या रावणाची लंका हीच वानरसेना जाळल्याशिवाय राहणार नाही, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत जाताच जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र, बीड जिल्ह्यातील या काका पुतण्यांचा राजकीय वाद पक्षांतरानंतर शिगेला पोहोचला आहे.