गुरूवारी सर्वोच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी तपासाची सूत्रं सीबीआयच्या हाती देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल व त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल, अशी टीका शिवसेनेनं केली.

न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आनंद व्यक्त केला होता. यावरही शिवसेननं त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. “न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये,” असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील, दिल्लीतील व बिहारसारख्या राज्यांतील काही मंडळींना अत्यानंदाचे भरतेच आले आहे. बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने ‘न्याय, सत्य’चा धोशा लावून नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीबीआयकडे तपास सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने हळूच फुंकर मारली, ‘‘मुंबई पोलिसांच्या तपासात सकृत्दर्शनी काहीच चूक दिसत नाही.’’ तरीही प्रामाणिकपणाची कदर न करता तपासाची सूत्रे सीबीआयकडे द्यावीत हे आश्चर्यच आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल व त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज हिंदुस्थानची घटना ही अश्रू ढाळत असेल. देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला यापद्धतीने घुसवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संघराज्यावरचे आक्रमण आणि त्यांनी आखून दिलेली चौकट मोडण्याचाच प्रकार आहे.

सीबीआय चौकशीच्या मान्यतेवरून ‘जितंमया’ करणाऱ्यांनी जरा सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाकडेही एकदा पाहायला हवे. पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते.
सुशांतच्या परिवाराने त्यांचा पुत्र गमावला व सुशांतने नेमकी आत्महत्या का केली हे रहस्य उलगडण्याच्या कामी पोलीस लागलेच आहेत, पण हे रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे. सीबीआयने राज्यातील एखाद्या प्रकरणाचा तपास करायला हरकत नाही, पण राज्यांच्या अधिकारांवर हे आक्रमण आहे.

बिहारमधील अनेक खून, हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, पण त्यापैकी किती खरे आरोपी आतापर्यंत सीबीआय पकडू शकली? ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी ‘फौज’ बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मुखियाचे खरे आरोपी कोणी पकडले असतील तर सांगावे. मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल नाहीतर सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही.

न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठsचा व त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.