शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुरखाबंदीच्या अग्रलेखावरुन माघार घेतली आहे. बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांची नाही असा खुलासा राऊत यांनी ‘मि. ओवेसी, घटना पुन्हा वाचा’ मथळ्याखालील रोखठोक या सदरात केला आहे.

‘बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण सामनाने छापले इतकाच हा विषय’ असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे.

श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तेथे राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून भारतातही बुरखा बंदी केली पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली होती. ‘रावणाच्या लंकेत घडले, रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, अशा शिर्षकाखालील १ मे या दिवशी सामना या मुखपत्रात आलेल्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी अशी मागणी करण्यात आली होती. बुरखा बंदीच्या मागणीवरून राजकारण तापत असल्याचे दिसताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता घुमजाव केलं आहे.