शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून परप्रांतीयांच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने संजय राऊत यांनी परप्रांतीयांसंबंधी भूमिका मांडली असून यावेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये –

“महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱया प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

परप्रांतीय कोण?

“नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱयाच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ानपिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

‘मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक नाडय़ा कोणाकडे?

“मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. श्रीमंतांना कोणीच परप्रांतीय, उपरे वगैरे मानत नाही. पण पोटासाठी भटकंती करणाऱया, मजूर वर्गाला परप्रांतीय म्हणून हिणवले जाते ही शोकांतिका आहे. अंबानी, अदानी, हिरानंदानी, रहेजा, कुकरेजा वगैरेंना कोणी ‘बाहेरचे’ म्हणणार नाही. राजकारण्यांत ते धाडसही नाही. मुंबईसारख्या शहरातले अनेक उद्योग व उद्योगांची कार्यालये बाहेर गेली. हेसुद्धा मुंबईवर आक्रमण करण्याचे परप्रांतीय उद्योग आहेत, अशी वेदना कोणाला होत नाही. जेट एअरवेज ही विमान कंपनी आता पुन्हा सुरू होत आहे. या कंपनीचे मुख्यालय आधी मुंबईत होते, ते आता दिल्लीजवळच्या गुडगावला नेले. आंदोलन यासाठी व्हायला हवे, पण येथे अनेकांचे इंटरेस्ट गुंतल्याने सगळेच चूप राहतात,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.

सभ्य आणि सुसंस्कृत!

“जावेद अख्तर यांनी ‘सामना’त एक लेख लिहिला. हिंदू समाज हा जगातील सगळय़ात सभ्य व सुसंस्कृत असल्याचे मत श्री. अख्तर यांनी व्यक्त केले. या सभ्यपणात महाराष्ट्राचा; मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, पण हिंदुत्वाचे ‘खोमेनीकरण’ व आजचे ‘तालिबानीकरण’ त्यांनी कधीच होऊ दिले नाही. म्हणून मुंबईत स्वतःला परप्रांतीय मानून राहणारे समाज हिंदू म्हणून कायम सुरक्षित राहिले. प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा दारुण पराभव केला. ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेलाच साद घातली व बाहेरचे लोक बंगालात येऊन वातावरण बिघडवत असल्याचा प्रचार केला. मोदी-शहांच्या सभांना जमवलेली गर्दी बाहेरची आहे, ते बंगाली लोक नाहीत, असे ममता बॅनर्जी सांगत राहिल्या. झारखंड, बिहार, ओडिशा, आसाममधून लोक आणून सभांना गर्दी करण्यात येत होती. ममता यांनी त्या काळात मोदी व शहांनाही बाहेरचे ठरवले होते. ‘बाहेरचे लोक’ म्हणजे कोण? त्या बाहेरच्या लोकांचा पराभव बंगाली जनतेने केला. याचे धडे महाराष्ट्रात परप्रांतीयांचे राजकारण करणाऱयांनी बंगालातून शिकायला हवेत. महाराष्ट्रात हे असे कधीच घडले नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“गुजरात, आसाम, तामीळनाडू, कर्नाटकात परप्रांतीयांविरुद्ध आंदोलने अनेकदा झालीच आहेत. बेळगावातील मराठी लोकांना आजही परप्रांतीयच समजले जाते व बेळगावातील निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारेच मुंबईत ‘परप्रांतीय’वादास फोडणी देत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले हे समजून न घेता त्यांचे उधळणे सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार आहे. देश सगळय़ांचाच आहे, पण कायदा-सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, असे भारतीय घटना सांगते. आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणाऱयांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे- ‘‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’’ मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते!,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

“शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांवर ‘ईडी’चा ससेमिरा लावता, मग भाजपचे सर्व पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत काय? ‘ईडी’ त्यांच्यामागे का लागत नाही? आर्थिक गुन्हे फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचेच लोक करतात काय? हे चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या प्रश्नाचे रोख उत्तर आहे. भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.