महानिर्मितीकडून पावसाळ्यात कंत्राट; निधी पाण्यात जाण्याचा धोका नागपूर : महानिर्मितीने पावसाळ्याच्या तोंडावर चंद्रपूर येथील इरई धरणातील बुडित क्षेत्रातील गाळ काढण्याचे कंत्राट अभी इंजिनिअरिंग प्रा. लिमी. या कंपनीला दिले आहे. पावसामुळे तेरा दिवसांतच हे काम ठप्प पडल्याने या कामातून महानिर्मितीचा निधी पाण्यात जाण्याचा धोका आहे. दरम्यान, महानिर्मितीने कंत्राटदाराला कामाच्या प्रमाणातच निधी देणार असल्याचा दावा केला आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात गेल्यावर्षी नेहमीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे महानिर्मितीने बांधलेल्या इरई धरणात कमी पाणीसाठा आहे. या धरणातून चंद्रपूरमधील महानिर्मितीच्या प्रकल्पासह शहराला पाणीपुरवठा होतो, परंतु पाण्याचा तुटवडय़ामुळे प्रकल्पातील काही वीजनिर्मिती संच बंद करावे लागले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ एप्रिल २०१८ च्या दरम्यान चंद्रपूरच्या पाणी प्रश्नावर एक बैठक घेतली. त्यात धरणातून गाळ काढण्याचे आदेश महानिर्मितीला दिले. त्यानुसार मे- २०१८ च्या पहिल्या आठवडय़ात महानिर्मितीने गाळ काढण्याच्या कामासाठी ९.५७ कोटी रुपयांची ई- निविदा काढली. अभी इंजिनिअरिंगने ९.२ टक्के अधिक तर सुभाष कासम गोट्टूवार यांनी २१ टक्के अधिक दराने निविदा सादर केली. कंपनीने अभी इंजिनिअरिंगचे दर कमी असल्याने त्यांना ७.२ टक्के अधिक दराने कंत्राट २१ मे २०१८ ला दिले गेले. कामाचा चार महिन्यांचा कालावधी निश्चित झाला. २६ मे रोजी कामाला सुरुवात झाली, परंतु मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात तेरा दिवसांतच काम ठप्प झाले. या कालावधीत १५ टक्के काम झाल्याचे महानिर्मितीकडे नमूद आहे, परंतु या अत्यल्प काळात एवढे काम शक्य नसल्याचे जाणकार सांगतात. पावसाने विश्राम दिल्यास काम पुढे केले जाणार असल्याचे कंत्राटदाराने महानिर्मितीला सांगितले आहे, परंतु पावसात धरणात पाणी आल्यावर हे काम कसे होणार, कामाचे मूल्यमापन अचूक होणार काय? हे प्रश्न कायम आहेत. साठवणूक क्षमतेत घट चंद्रपूरच्या नदीवर इरई धरण हे महानिर्मितीने १९८० च्या सुमारास बांधले. त्यावेळी या धरणाची क्षमता १९३ दशलक्ष घनमीटर (एमएमक्यू) होती, परंतु नदीच्या प्रवाहासोबत गाळ जमत गेल्याने सध्या ती १४२ दशलक्ष घनमीटरवर आली. पाण्याचा साठा वाढवण्यासाठी उन्हाळ्यात गाळ काढणे अपेक्षित होते, परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या धरणाच्या खोलीकरणाचे काम देण्यात आले. इरई धरणातील गाळ काढण्याचे कंत्राट अभी इंजिनिअरिंग या कंपनीला विलंबाने दिले असले तरी प्रत्येक कामावर प्रशासनाचे लक्ष आहे. सध्या पावसाने काही दिवस काम बंद होते, परंतु थोडय़ा प्रमाणात पुन्हा काम सुरू झाले. कामापूर्वी धरणातील पाण्याची पातळी तपासली आहे. त्यामुळे काम झाल्यावर पुन्हा पातळी तपासली जाणार आहे. सोबत येथील प्रत्येक कामाचे व्हिडिओ शूटिंग होत आहे. त्यामुळे महानिर्मितीचा एक रुपयाही वाया जाऊ दिला जाणार नाही. - उमेश चव्हाण, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर.