रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत असं भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे. "आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. "अनिल परब यांनीच ट्विट करत १३ तारखेला पार्टी झाली असं सांगितलं. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत," असा दावा नितेश राणे यांनी केला. आणखी वाचा- …तर हे डीजीपी नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील; जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा तसंच काँग्रेसप्रमाणे शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. "शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे," अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आणखी वाचा- “फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिली” "इशाऱ्यावर राजकारण केलं जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. मागितल्यास माझ्याकडे असणारी माहिती देण्यास तयार आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. "सुशांतने 'पवित्र रिश्ता'मध्ये केलेली पहिली भूमिका मराठी तरुणाची होती. सुशांत मराठी अस्मिता जपणारा तरुण होती. त्याच्यासाठी आपण उभं राहण्यास तयार आहोत," असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं. "मराठी तरुण, मराठी अस्मिता या गोष्टी नाइटलाइफ करताना आठवत नाहीत का? ओपन जीमचं उद्घाटन करताना नेहमी बॉलिवूड कलाकारच दिसतात. आपले मराठी कलाकार का दिसत नाहीत ? अडचण आली की मराठी अस्मिता, भूमिपूत्र हेच विषय दिसतात. मुंबई पोलिसांचं खच्चीकरण केलं जात असून त्यांच्यावर दबाव आहे. कोणाचा दबाव आहे हे सीबीआय तपासात स्पष्ट होईल," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.