तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरणाऱ्या कोकणाला पुन्हा एका संकटाची नजर लागली. पावसाने कोकणात कहर केला. अनेक गावं पाण्याखाली गेली, रस्ते वाहून गेले, संपर्क तुटला. या सगळ्यात एका घटनेनं महाराष्ट्रावर प्रहार केला… ती घटना होती अर्थात तळीयेची! दरड कोसळली आणि संपूर्ण गाव उध्वस्त झालं. यात ५१ जणांचा मृत्यू झाला तर ढिगाऱ्याखाली दबलेल्या ३१जणांना मृत घोषित करण्यात आलं. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कशी घडली? या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका मुलीने हा घटनाक्रम उलगडला… मृत्यूच्या दाढेतून परतलेली तळीयेतील अक्षदा काय म्हणाली ऐका…

मृतदेहांची विटंबना… ग्रामस्थांची विनवणी; शोधकार्य थांबवलं-

पावसाने धो-धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली. ३५ घरं असलेल्या तळीये गावात मृत्यूनं अक्षरशः तांडव घातलं. बाळसं धरणाऱ्या चिमुकल्या जिवांपासून ते त्यांना खेळवण्यासाठी आसुरलेल्या वृद्धांवर काळाने झडप घातली. दगड मातीच्या ढिगाऱ्याने तळीयेतील अनेक जिवांचा घास घेतला. अचानक कोसळलेल्या संकटानं तळीये गावाचे हुंदके अजूनही थांबलेले नाहीत, पण डोळ्यातील आसवं थिजली आहेत. शोध मोहिमेदरम्यान मातीतून काढले जाणारे मृतदेह आणि त्यांची होत असलेली विटंबना पाहून ग्रामस्थांचं काळीज हेलावलं आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली गाडलेल्या जिवलगांच्या परतीची आशाही सोडली. हुंदके आवरत ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवणी केली आणि प्रशासनानं ३१ बेपत्तांना मृत घोषित करत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर हाती घेण्यात आलेल्या बचाव कार्यात ५१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.