नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना अचानकपणे आलेल्या पुरात सरणासह मृतदेह वाहून गेला. वणी तालुक्यातील पळसोनी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

पळसोनी येथील सीताराम बापूराव बेलेकर (वय ५७) यांचे सोमवारी दुपारी अपघाती निधन झाले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. गावालगत निगुर्डा नदीपात्र पूर्णपणे कोरडे असल्याने तिथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार काही नातेवाईक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. दरम्यान, चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळात नदीपात्रात अचानक पाण्याच्या प्रवाहाचा लोंढा आला. काही क्षणांतच नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे उपस्थित लोकांची नदी पात्राबाहेर पडण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. या पुरात सरणासह त्यावरील मृतदेहसुद्धा वाहून जायला लागला. जमलेल्या नागरिकांनी मृतदेह पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुरात वाहून गेला. या मृतदेहाचा शोध सुरू होता.