सामाजिक बांधिलकी म्हणून एका वडापाव विक्रेत्याने एका दिवसाच्या व्यवसायातून येणारे पैसे हे पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. दुपारी साडेतीन पर्यंत तब्बल या विक्रेत्याचे  आठशे वडापाव विकले गेले असून या स्तुत्य उपक्रमाला नागरिक देखील भरपूर प्रदिसाद देत आहेत. अभिजित जाधव असे वडापाव दुकानदाराच्या मालकाचे नाव असून त्यांचे पिंपरीतील थेरगाव परिसरात जाधव वडेवाले म्हणून गाडी आहे. ते थेरगाव सोशल फाउंडेशन मार्फत मदत करत आहेत. आज त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करताच नागरिक वडापाव घेण्यासाठी गर्दी केली आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याने पुराच्या पाण्यात लाखो नागरिक हे बेघर झालेले आहेत. पूरग्रस्त नागरिक आहे त्या कपड्यांवर स्थलांतरित झाले असून सध्या तेथील मानवी जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. पाऊस थांबला असून पुराचे पाणी ओसरत आहे. याचमुळे लाखो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून सर्व स्थरातून नागरिकांना आर्थिक, कपडे, औषधे आणि अन्नाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यात पिंपरी-चिंचवड देखील पाठीमागे नाही. थेरगाव येथील जाधव वडेवाले यांनी एका दिवसाचे येणारे पैसे हे सांगली येथील वाळवा या गावातील पूरग्रस्त नागरिकांना देणार असल्याचे सांगितले.

जाधव वडेवाले चे मालक अभिजित जाधव म्हणाले की, तेथील नागरिकांना मदतीची गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे समाजकार्य करत आहे. ते आज अडचणीत आहेत त्यांना मदत हवी आहे. त्यामुळे आजचे येणारे सर्व पैसे पूरग्रस्तांना देणार आहे. शिवाय सकाळ पासून साडेतीन पर्यंत तब्बल ८०० वडापाव विकले गेले आहेत. केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून रात्री नऊ पर्यंत दुकान उघडे असेल अधिक लोकांनी यावं असे जाधव म्हणाले जेणे करून पूरग्रस्तांना अधिक मदत होईल.