लहानबालकांवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश नातेवाईक व परिचितच असतात. घराबाहेर स्वत:ची काळजी कशी घ्यायची याची शिकवण आपण मुलांना देतो, पण घरात व परिचितांमध्ये “लपलेल्या श्वापदां”पासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची याचे धडे मुलांना देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

राज्य महिला आयोगाच्या वतीने औरंगाबाद येथे मंगळवारी आयोजित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कायद्यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना रहाटकर बोलत होत्या. या परिषदेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चित्रफितीवरून दिलेल्या संदेशाने झाले. व्यासपीठावर गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, कनार्टक आदी राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा अनुक्रमे लीलाबेन अंकोलिया, विमला बाथम, कल्याणी शरण, डेजी ठाकूर आदींसह विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनही करण्यात आले.

विजयाताई रहाटकर म्हणाल्या, देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ आदी ठिकाणी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोक्सोच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्याची सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने सांगड घालण्याची गरज आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, मुलांसाठी काम करणारे कैलास सत्यार्थी यांचेही शुभेच्छांचे संदेश आल्याचे या परिषदेत सांगण्यात आले.

रहाटकर म्हणाल्या, बालकांना आता अत्याचारापासून बचाव करण्याची शिकवण देण्याची वेळ आली आहे. पोक्सो या कायद्यात आता सुधारणा झाली असून त्यामध्ये गुन्हेगाराला चार महिन्याच्या आत शिक्षा होऊ शकते. शिक्षेत फाशीचीही तरतूद असल्याने ही मोठी दिलासादायक बाब असून त्याविषयीचीच जनजागृती करण्याची वेळ आली आहे. पोक्सो कायदा हा लिंग निरपेक्ष आहे. त्यामध्ये स्त्री अथवा पुरुष जरी दोषी असला तरी त्याला शिक्षा ठरलेली आहे. विजया रहाटकर यांनी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधींच्या व कैलास सत्यार्थींनी शुभेच्छा पाठवल्याचे सांगितले.