|| वसंत मुंडे ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे आता डोंगरी भागातील तरुण मुलांना कोणीही मुलगी द्यायला तयार होत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्य़ात प्रकर्षांने समोर येत आहे. असुविधा आणि टंचाईमुळे मागास अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्य़ात गावोगावी लग्नाच्या वयातले अनेक अविवाहित तरुण आहेत. या गावांमधील जुनीजाणती मंडळी नातेवाईकांमध्ये मुली देण्याविषयी अक्षरश: विनवणी करत आहेत. दोन हजार लोकसंख्येच्या हटकरवाडीत कोणतीच सुविधा नसल्याने जुने नातेवाईकही आता मुली देत नाहीत. हीच परिस्थिती या भागातील बहुतांशी वाडय़ांची. आवळवाडीच्या जनावरांच्या छावणीवर पाच जनावरे घेऊन असलेले ज्ञानोबा तात्याबा सानप (वय ७०) सहा महिने ऊसतोडणी हंगाम करून परतलेले. ‘गुडघे साथ देत नाहीत, बसले तर उठवत नाही. तरीही ऊसतोडणी केल्याशिवाय पोट भरत नाही. या वर्षी दुष्काळाने मजूर वाढल्याने कारखान्यावर काम कमी झाल्याने हातात पसा जेमतेम पडल्याने छावणीवरच दिवस काढण्याची वेळ आली आहे’ असे सानप सांगतात. तर याच गावातील गहिनीनाथ दराडे म्हणाले, ‘पंधरा हजार खर्च करून लावलेल्या कापसातून दहा हजार मिळाले. गावाला कोणतीच सुविधा नसल्याने बाहेरचे लोक मुली देत नाहीत. पूर्वी गावातच सोयीरपण होत असे, मात्र, आता गावातले लोकही आपल्या मुलींची या दुष्काळी दाहकतेतून सुटका करण्यासाठी गावात मुली देत नाहीत.’ वयात आलेली पन्नास मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. तर याच गावातील गयाबाई देवीदास सानप यांना दोन मुले. एका मुलाचा विवाह झाला, तर दुसरा पंचवीस वर्षांचा होऊनही त्याला मुलगी मिळत नाही. पाहुणे पसे देऊनही गावात मुलगी द्यायला धजावत नसल्याने लग्न करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जिल्ह्य़ातून दरवर्षी चार लाखांपेक्षा जास्त ऊसतोडणी मजूर बिऱ्हाड पाठीवर टाकून सहा महिने राज्यभरातील साखर कारखान्यांवर जातात. नेत्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांवर राजकीय पोळ्या भाजल्या तरी मजुरांचे प्रश्न मात्र कायम असल्याने या वेळच्या दुष्काळात मजुरांनी कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे. चिंचवण (ता. वडवणी) येथील सोमनाथ बडे म्हणाले, या वर्षी गावातून शंभरपेक्षा जास्त जोडपी ऊसतोडणीला गेली. मात्र गावात शेतीमधील रोजगार, पाणी आणि चारा नसल्यामुळे जवळपास पन्नास जोडपी परतलीच नाहीत. काही परत येऊन ओतूर (जि. पुणे) या ठिकाणी कामाला गेले आहेत. कोठरबन येथील नवीन डोंगरे हा तरुण सांगतो, ‘घरी पाच एकर शेती असली तरी या वर्षी कापूस गुडघ्यापर्यंत येऊन वाळून गेल्याने पाचजणांचे कुटुंब जगवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. मित्राच्या मदतीने गुजरातमध्ये जाऊन खासगी रुग्णालयात काम धरले’. गावातील जवळपास पन्नास तरुण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या शहरात मिळेल ते काम करून दुष्काळी परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडत असल्याने ते गावाकडे परत येण्याची शक्यता दुरावली आहे. हटकरवाडी (ता. शिरूकासार) येथील हिराबाई किसन सदगर (वय ७०) यांच्याकडे दहा एकर जमीन. मात्र, पिकत काहीच नसल्याने त्यांचा मुलगा दादा सदगर कामासाठी इस्लामपूर (जि. सांगली) येथे गेला आणि तिकडेच राहिला. गावातील ऊसतोड मजुरांच्या बहुतांश तरुण मुलांनी मोठय़ा शहरांमध्ये मिळेल ते बिगारी काम शोधत ऊसतोडणीच्या कामातून सुटका करून घेत गाव सोडला असल्याचे सामाजिक कार्यकत्रे सुरेश राजहंस सांगतात. भनकवाडी येथील विक्रम सोनसळे (वय ५१) यांचीही पाच एकर शेती. वीस हजार खर्च करून कापूस पिकला दोन क्विंटल. त्यामुळे रायमोहा येथे चार पत्र्याचे चहाचे हॉटेल टाकून कुटुंबाची ते गुजराण करतात. गावातील बहुतांश लोक कामाच्या शोधात शहराकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीड तालुक्यातील शहाजानपूर येथील भीमराव व यमुनाबाई घुमरे हे वृद्ध दाम्पत्य चार जनावरे घेऊन मागील दोन महिन्यांपासून छावणीवर आहेत. या वर्षी शेतात एक चिपटेही माल झाला नसल्याने त्यांनी छावणीचा आश्रय घेतला. पालवणच्या छावणीवर असलेले दिलीप शिवाजी घोलप, अमोल शिवाजी गुरव, देवीदास बागलाने हे वेगवेगळ्या गावचे शेतकरी आपली गुरे घेऊन छावणीत तीन महिन्यांपासून राहतात. छावणीमुळे जनावरे जगली अन्यथा विकण्याशिवाय पर्याय नव्हता, अशीच भावना या शेतकऱ्यांची आहे. आता स्थलांतर कायमस्वरूपीच गावात पाणी, चारा आणि रोजगार नसल्याने ऊसतोड मजुरांची अनेक कुटुंबे साखर कारखान्याचा पट्टा पडला तरी परतलीच नाहीत. दरवर्षी सहा महिने ऊसतोडीला गेलेले मजूर गाळप हंगाम संपताच घराच्या ओढीने परततात. यंदा दुष्काळाने मजुरांची घराची ओढच आटल्याने गावागावांतील अनेक कुटुंबे पाणी, रोजगार असलेल्या ठिकाणीच थांबली आहेत. मजुरांच्या बेरोजगार तरुण मुलांनीही कामासाठी शहर जवळ करून कायमस्वरूपी स्थलांतर केल्याने या वर्षी पूर्वीच्या दुष्काळात न दिसणारी स्थलांतराची दाहकता दिसत आहे.