दिगंबर शिंदे, सांगली

जिल्हय़ातील तीन मतदारसंघांमध्ये झालेली बंडखोरी ही महायुतीची डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना राज्यभर प्रचारासाठी मोकळीक महायुतीत झालेल्या बंडखोरीने मिळवून दिली असून, त्याचा फटका महायुतीला अन्य मतदारसंघांत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिराळा आणि जत या दोन मतदारसंघांतील बंडखोरी भाजपच्या मुळावर उठली तर नवल नाही. एरवी बंडखोरी हा स्वभाव धर्म असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र बंडखोरी औषधालाही दिसली नाही.

भाजपमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र अखेपर्यंत बंडखोरांनी दाद दिली नाही. आमदार पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला जागा मिळाली असून सेनेचे शिवबंधन हाती बांधून गौरव नायकवडी हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मदानात उतरले आहेत. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. निशिकांत पाटील यांना गेली तीन वर्षे भाजपने उमेदवारी देतो असे सांगून काम करायला भाग पाडले. मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच भापजचे मूळ कार्यकत्रे असलेल्या विक्रम पाटील यांच्याशी असलेले मतभेद यातून पक्षांतर्गत संघर्ष वाढला होता. पक्षांतर्गत गटबाजीतून नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडण्यात आले होते.

इस्लामपूर मतदारसंघात आता वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटनेसह पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही तिरंगी होत आहे. एकास एक उमेदवार देऊन जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची भाजपची रणनीती मोडीत निघाली असून या बहुरंगी लढतीचा लाभ राष्ट्रवादी उठविण्याच्या तयारीत आहे. यामुळे आ. पाटील यांना अन्य मतदारसंघात विशेषत शिराळा मतदारसंघात लक्ष घालण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे.

इस्लामपूर मतदारसंघालगत असलेल्या शिराळा मतदारसंघात याचे परिणाम होणार आहेत. शिराळा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या वाळवा तालुक्यातील ४२ गावांमध्ये आमदार पाटील यांचेही कार्यक्षेत्र आहे.

जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा सामना काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्याशी असून आता सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीकडून मदानात उतरलेले भाजपचे डॉ. रवीद्र आरळी यांची बंडखोरी जगताप यांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी आपली बंडखोरी मागे घेतली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत शेजाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली असून, अद्याप आपली राजकीय  भूमिका स्पष्ट केलेली नाही. या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात उरले असले तरी खरा सामना राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील आणि  भाजपचे अजितराव घोरपडे यांच्यात होत आहे.

आघाडीला दिलासा

शिराळा आणि जत या दोन मतदारसंघांतील बंडखोरी भाजपच्या मुळावर उठली तर नवल नाही. एरवी बंडखोरी हा स्वभाव धर्म असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र बंडखोरी औषधालाही दिसली नाही.