रत्नागिरी : रत्नागिरी जवळच पुर्णगड येथील समुद्रात बुडणा-या १६ तरुणांना स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांना वाचविण्यात यश आले आहे. पुर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या १६ तरूणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट पाण्यात बुडाल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रनपार गावातील १६ तरुण मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट पलटी होऊन सर्व तरुण पाण्यात पडले. मात्र जवळच असलेल्या अल फरदिन बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेवून तात्काळ मदतीला धावले. त्याचवेळी, रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान अंतर्गत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सिल्वर सन पायलट बोटीवरील पोलीस कर्मचारी मुजावर, विजय वाघब्रे, आणि अपूर्व जाधव यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.

त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व १६ तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. बचावलेल्या सर्व १६ तरुणांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येवून त्यांना त्यांच्या पालक आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुर्दैवाने, या अपघतात सरस्वती बोट ही पूर्णपणे पाण्यात बुडाली. या घटनेचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे करत आहे.