महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) रायगड जिल्ह्य़ात २०१३-१४ या अधिक वर्षांत आतापर्यंत १६ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यातून १८७२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्य़ात महात्मा गांधी नरेगा योजनेतून फार कमी खर्च होत होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करून शेतीच्या कामांचा अंतर्भाव यात केला. त्यामुळे निधी खर्च होऊ लागला. दोन वर्षांपूर्वी हा खर्च केवळ १५ लाख रुपये होता, तो आता १७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत स्तरावर १२८२ व इतर ५९० कामे करण्यात आली असून १८७२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. सात लाख ५० हजार मनुष्यदिन कामाची निर्मिती झाली.
शेतीची दुरुस्ती, जुन्या भातशेतीची दुरुस्ती, गावातील रस्त्यांची दुरुस्ती, रोपवाटिका, वृक्षलागवड, खारलॅण्डची कामे, बंधाऱ्याची कामे, अल्पभूधारक, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शेतीची दुरुस्ती आदी कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध होत आहे.