धाराशिव, दि. ५ : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील रोहण राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी सरकारने जागे व्हावे, आरक्षण द्यावे, अशी चिठ्ठी लिहून ठेवत शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गुरूवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. हेही वाचा >>> रायगड जिल्ह्यात ८० हजारांच्यावर कुणबी नोंदी, अभिलेख तपासणीसाठी भाषातज्ञांची मदत घेणार कळंब तालुक्यातील दहिफळ येथील तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्याने कृषी पदविकेचे शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी फिरला. परंतु कुठेही नोकरीची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने गावात दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला. त्याने तीन गायी घेवून दूध डेअरीतून चांगले उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुधाचे दर कमी-जास्त होत असल्याने चिंतेत होता. कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला? कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. जर आरक्षण असते तर कुठे तरी संधी मिळाली असती. अशा सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता. दहिफळ येथे ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती. आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत. अखेरची लढाई म्हणत मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीच्या दुसर्याच दिवशी ‘मराठा आरक्षणासाठी मी बलिदान देत आहे. सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे’ असा मजकूर लिहून ठेवत रोहणने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.