इंदापूरजवळ शिवनेरीला वाहन धडकून डोंबिवलीचे ७ मृत्युमुखी; तेलंगणात मालमोटार ऑटोरिक्षावर उलटली; शिर्डीजवळ विचित्र अपघात
तेलंगणामधील आदिलाबाद जिल्हय़ात, मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूरजवळ आणि शिर्डीजवळ नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या तीन भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये भोकर तालुक्यातील एकाच कुटुंबातील ९ आणि डोंबिवलीतील ७ जण ठार झाले.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास शिवनेरी आणि वॅगनआर गाडीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सात जण ठार झाले. शिवनेरी बस पणजीहून मुंबईकडे येत होती, तर डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय गाडीने रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावाकडे उत्सवासाठी निघाले होते. इंदापूरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी समोरून येणाऱ्या शिवनेरी बसवर जोरदार आदळली.
तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हय़ातील बासर रस्त्यावर देगावजवळ खडीने भरलेली मालमोटार रिक्षावर उलटल्याने झालेल्या अपघातात १५ जण ठार झाले. भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील बाजेकर कुटुंबातील ९ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. आडोली येथे कार्यक्रमासाठी निजामाबादजवळील नवी पेठ येथील वीटभट्टीवर काम करणारे मजूर कंदुरीसाठी रिक्षाने गेले होते. म्हैसा येथून रस्त्याच्या कामासाठी खडी वाहून नेणारी मालमोटार दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षावर उलटली.
शिर्डीजवळ नगर-मनमाड महामार्गावर, निर्मळ िपप्री गावाच्या शिवारात, पवनचक्कीच्या पात्यांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारीला मागील बाजूने खाजगी बस धडकल्याने अपघात झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. मालमोटर पवनचक्कीचे लांबलचक पाते घेऊन नगरच्या दिशेने जात असताना लक्झरी बसने मागून जोराची धडक दिली. पाते बसमध्ये घुसल्याने बसचालक, क्लिनरसह दोन महिलांचा मृत्यू झाला अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मृतांची नावे
संतोष तांबे (वय ४३), स्वप्निल तांबे (वय ३५), स्वाती तांबे (वय ३५), वृषभ तांबे (वय ८), सूर्यकांत तांबे (वय ४७) भिकू तांबे (वय ७२) आणि चालक प्रवीण पांडव (वय २९)(सर्व राहणार डोंबिवली) यांचा मृत्यू झाला.