Kalyan Society Scuffle : कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना पाहायाला मिळत आहे. शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा मारहाणीचा प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.

राज्यात भाजपा आणि शिंदे यांचं सरकारच्या काळात असे प्रकार वाढल्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, “कल्याणमधील घटना दुर्दैवी आणि संतापजनक आहे. समाजातील, जातींमधील तसेच मराठी आणि अमराठी वादांना गेल्या दोन वर्षात भाजपा आणि एकनाथ शिंदे सरकार जास्त प्रोत्साहन देत आहे का? गेल्या दोन वर्षात असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते. मागच्या महिन्यात दक्षिण मुंबईत तुम्ही मारवाडीत किंवा हिंदीत बोला असंही सांगण्यात आलं, कारण भाजपचं राज्य आलं आहे”

“राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणं… हा प्रत्येक जिल्हा मराठी माणसाचाच आहे. मुंबई आधी आमच्या राज्याची राजधानी आहे, नंतर देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक वेगवेगळ्या भाषेची लोकं आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येत आहेत आणि मिळून मिसळून राहत आहेत. कुठेही कोणाला त्रास होत नव्हता. आनंदाने आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे होऊन राहा, कोणालाही दुखवण्याचं कारण नाही. पण जेव्हा कोण कालसारखं आमच्यावर मस्ती, माज दाखवतो तर मग आमच्या तरुणांनी त्याा न्यायाचा हात कसा असतो ते दाखवलं तर पोलीसांनीमध्ये येऊ नये”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे पार्सल जिथून आलं तिथे पाठवा

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना ही विनंती करणार आहे की, हा एमटीडीसीमधील कोणीतरी आहे, जो काल मराठी माणसाला माज दाखवत होता, त्याला एकतर बडतर्फ करा आणि हे पार्सल जिथून आलं आहे तिथेॉ पाठवावं”.

“हे वाद आमच्या महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी कधीच नव्हते. हा माज कधीच नव्हता. अनेक भाषिक लोकं मुंबईत आणि महाराष्ट्रात राहतात. पण हे व्हेज – नॉनव्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही. इथे नॉनव्हेज रेस्टॉरंट सुरू करू शकत नाही. हे कुठून सुरू झालं. आमच्या प्रथा-परंपरेत आम्ही मटण, मच्छी खातो. इतके दिवस कोणी अडवत नव्हतं. मग आत्ता व्हेजीटेरियन सोसायटी कशाला?”.

हेही वाचा>> Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!

आदित्य ठाकरेंनी या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे काही मागण्यादेखील केल्या आहेत. ते म्हणाले की, “कालचा जो वाद झाला त्या पार्श्वभूमीवर मुंबईत किंवा राज्यातील कुठल्याही शहरात जर व्हेज सोसायटी कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द झाली पाहिजे. मराठी माणसाला घर दिलं नाही तरी ओसी रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसींग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी मराठी माणसाला दाबण्याच प्रयत्न केला तर महाराष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील तर आमच्या मागणीला मान देऊन महाराष्ट्र द्रोहाचा आणतील”, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.