Sayaji Shinde on Hindi Language ompulsory in Primary Schools : महाराष्ट्र सरकारने इयता पहिलीपासून मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली आहे. सरकारने आधी हिंदी शिकणं अनिवार्य केलं होतं. मात्र, जनतेच्या विरोधानंतर सरकारने त्यांच्या धोरणातून अनिवार्य शब्द हटवून अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा रेटण्याचं काम चालू केलं आहे. मात्र, जनतेतून याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कोवळ्या मुलांवर तीन-तीन भाषा शिकण्याची सक्ती कशाला? हिंदीच पुढे का रेटली जातेय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील राज्य सरकारच्या भाषा सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
“भाषेची सक्ती करून ती कोणालाही येत नाही. भाषा ही आईकडून येते. सक्तीने भाषा लादली म्हणून सगळं काही बदलत नाही. सक्तीने भाषा बदलतही नाही”. अशा शब्दांत हिंदी भाषा शिकण्याच्या सक्तीवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मुलांना मराठी भाषेत शिकवा. हाच खरा बदल घडवण्याचा मार्ग आहे”. असं परखड मत सयाजी शिंदे यांनी मांडलं आहे. सयाजी शिंदे टीव्ही ९ मराठीशई बोलत होते.
सयाजी शिंदे नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे म्हणाले, “मुलांवर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणं पूर्णपणे चुकीचं आहे. हे खूप असंवेदनशील, अशास्त्रीय आहे. मी आज जो काही आहे, जो कोणी आहे तो केवळ माझ्या मराठी भाषेमुळे, माझ्या मातृभाषेमुळे आहे. माझ्या आईची, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची भाषा ही मराठी आहे. आपण मराठीत शिकलं पाहिजे. लहानपणीच इतर भाषा शिकण्याची सक्ती कशाला? मुलांना आधी मराठी नीट शिकू द्या. मी मराठी भाषेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मी मराठीत शिकलो आहे. मला वाटतं की मराठी भाषेइतकं समृद्ध वाङ्मय दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही”.
सयाजी शिंदेंकडून शैक्षणिक धोरण मागे घेण्याची विनंती
ज्येष्ठ अभिनेते म्हणाले, “माझी सरकारला विनंती आहे की काहीही करा, परंतु हे धोरण मागे घ्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) असतील, हिंदीची सक्ती करणाऱ्या समितीमधील भाषा शास्त्रातील तज्ज्ञ असतील, त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की भाषेची सक्ती करू नका. हा निर्णय मागे घ्या. आपण सरकारला भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं पाहिजे, असं माझं मत आहे. प्रत्येक राज्यात त्यांच्या राज्यभाषेला महत्त्व दिलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला महत्त्व द्यायला हवं. मराठीचा आदर करायला हवा. मात्र, कुठलीही भाषा मुलांवर लादायला नको”.