करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्याबात वेगवेगळे मतप्रवाह होते. राज्यातील शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही शाळा सुरू करण्याबाबत भाष्य केलं होतं. आता शाळा सुरु करण्याबाबत आदित्य ठाकरेंनीही शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आज मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबई महानगरपालिका आणि राज्य कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत आज आढावा बैठक झाली. आता करोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आम्ही या बैठकीत आम्ही राज्यातल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण आणि शैक्षणिक संस्था पुन्हा खुल्या करणं कितपत सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला. वर्षा गायकवाड यांनी आज सांगितलं, “मधील काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे,” हेही वाचा - मोठी बातमी! राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु?; वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, “निर्णय आल्यानंतर शाळा सुरु करण्यासंबंधी प्रक्रियेला सुरुवात होईल. स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय व्हावा अशीच आमचीही इच्छा आहे. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण व्हावं यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर येऊन लसीसकरणाची विनंती केली आहे. तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही लस घेऊनच शाळेत यावं असंही सांगणार आहोत.”