लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र बेताबेताने पिकांना पोषक ठरणारा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांत पावसाने उघडीप दिल्यानंतर तीव्र उकाडा जाणवत असताना, खरीप पिकांच्या वाढीसाठी पुन्हा पावसाची सार्वत्रिक अपेक्षा होती. सुदैवाने मघा नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर कमी-जास्त प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

ढगांच्या गडगडाटासह मघा नक्षत्राच्या सरी कोसळत असल्यामुळे उकाड्याची तीव्रता कमी जाणवत आहे. काल शुक्रवारी रात्री पावसाच्या हलक्या व मध्यम सरी कोसळल्यानंतर शनिवारी, दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावली. दक्षिण सोलापूर (१३.५), मोहोळ (१८), माढा (१५.३), करमाळा (१६.५), पंढरपूर (१६.४), माळशिरस (८.८), अक्कलकोट (८.४) आदी तालुक्यांमध्ये पिकांसाठी पोषक ठरणारा पाऊस झाला. उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला या भागात तुलनेने अत्यल्प पाऊस झाला.

आणखी वाचा-पंढरपूर दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’साठी ११० कोटींच्या आराखड्याला मान्यता

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामात पिकांचा पेरा वाढला आहे. विशेषतः सोयाबीन आणि उडीद लागवड प्रत्येकी दीड लाख हेक्टरच्या घरात असून, ही पिके चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. मका, तूर, बाजरी आदी इतर पिकांची स्थितीही चांगली असल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या जूनमध्ये एकूण सरासरी १६ दिवसांत २२८.२ (२२२.६ टक्के) पाऊस झाला होता, तर मागील जुलैमध्ये सरासरी १३ दिवसांत १२३.८ (१३०.६ टक्के) एवढा पाऊस झाला होता. चालू ऑगस्टमध्ये सरासरी ५ दिवस ४७.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.