जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर रुग्णांना वेळेवर भेटून उपचार देत नाहीत. परिचारिका रुग्णांशी उद्धट वर्तन करतात, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घातला व दवाखान्याच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्याची मागणी केली.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार गेल्या काही दिवसांपासून ढेपाळला आहे. गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्ण दूरवरून उपचारार्थ येथे दाखल होतात. परंतु ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची गरसोय होते. त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. सोनोग्राफी करण्यास येणाऱ्या रुग्णांना तब्बल १५ दिवस वाट पाहावी लागते. औषधेही बाहेरून आणावी लागतात. शासकीय रुग्णालयातील स्थितीची पाहणी करण्यास मनसे कार्यकर्त्यांनी दवाखान्यास भेट दिली. त्यावेळी तेथे एकही डॉक्टर कर्तव्यावर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. या वेळी रुग्णांच्या लांबलचक रांगा होत्या. ग्रामीण भागातून आलेले रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबले होते. परिचारिकांकडे विचारणा केली असता त्या उद्धटपणे उत्तरे देत होत्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालून जाब विचारण्यात आला व रुग्णांच्या तक्रारी लवकर मार्गी लावण्याची, तसेच त्यांची हेळसांड थांबविण्याची मागणी करण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते यांनी पत्रात म्हटले आहे.