सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभरात १२ हजारांहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे आणि बारवांची निर्मिती करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा आदर्श राज्य कारभार, युद्धनीती आणि न्यायव्यवस्थेतून आजही नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास, पंचायतराज तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. अहिल्यादेवींच्या आदर्श समाज व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजच्या पिढीने केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवरून विद्यापीठात रस्ता जात असल्याने होणारी कायदेशीर अडचण दूर केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या प्रगतिपथावरील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा रिपाइं आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे आदींची उपस्थिती होती. डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.