अहिल्यानगर: त्र्यंबकेश्वर येथुन आषाढी वारीसाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूरमध्ये भाविक व वरुणराजाने स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने तहसिलदार मिलींदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, नायब तहसीलदार घोरपडे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगरध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, अभियंता सूर्यकांत गवळी, ग्रंथपाल स्वाती पुरे, स्वागत समितीचे रमेश कोठारी आदींनी स्वागत केले.
पालखी व दिंडीचे मानकरी हभप. बाळकृष्ण महाराज डावरे, राहुल महाराज सांळुके, पालखी सोहळा प्रमुख हभप. नवनाथ महाराज गांगुर्डे, जयंत महाराज गोसावी आदि दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. प्रमुख मार्गावर माजी नगरसेवक, राजकीय व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नार्दन ब्रँचजवळ पालखी रथातुन उतरवुन तरुण भाविकांनी विठुनामाच्या जयजयकारात शोभायात्रा मेनरोडमार्गे श्रीराम मंदिरात आणली.
मंदिराचे विश्वस्त प्रणिती गिरमे, रौनक गिरमे, दीपेश सूर्यवशी व उपाध्ये परिवार आदिंनी पूजा केली. अशोक उपाध्ये यांनी स्वागत केले. दिंडी प्रमुखांचा व्यापारी व हमाल पंचायततर्फे सन्मान केला. माजी नगराध्यक्ष आदिक व राष्ट्रवादी कॉंग्रेसने वारकऱ्यांना मिठाई देऊन दिंडीसाठी निधी सुपूर्द केला. वारकऱ्यांना सेवाभावी कार्यकर्त्यांनी पाणी, खाद्य पदार्थांचे वाटप केले. मराठा महासंघाने बेलापुर रोडवर खिचडी प्रसादाचे वाटप केले. ध्वनीवर्धकावर भजने, भक्तीगिते लावण्यात आली होती. चौकाचौकात विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. तृतीय पंथीयांनी दिंडीचे स्वागत केले.