अहिल्यानगरः सत्ता गेल्यानंतर विस्कळीत झालेल्या जिल्हा काँग्रेस संघटनेच्या पुनर्बांधणीस अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शहर जिल्हाध्यक्षासह काही तालुक्यांतील अध्यक्षपदही रिक्त आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दौरा सुरू केला. मात्र, हा दौरा अपूर्णच राहिला. रिक्त जागांवर पदाधिकारी केव्हा नियुक्त केले जातात, याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा निर्माण झाली आहे.
जिल्हा काँग्रेसमध्ये विखे व थोरात हे दोन गट अस्तित्वात असताना पक्ष अधिक मजबूत होता. पक्ष कार्यकर्त्याचे जिल्हाभर जाळे होते. पक्ष संघटनाही मजबूत होती. श्री राधाकृष्ण विखे यांनी पक्ष सोडताना त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्षासह प्रमुख पदाधिकारीही भाजपमध्ये गेले. त्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटनेची एकहाती धुरा माजी मंत्री थोरात यांच्यावर पडली. मात्र, त्यांनी नियुक्त केलेले ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लागोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
थोरात राज्य पातळीवर काँग्रेसचे नेतृत्व करत असले तरी जिल्हा पातळीवर पक्षाची संघटना विस्कळीत झालेली आहे. सोडचिठ्ठी दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. पक्षात कार्यकर्ते असले तरी तालुक्यात, जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व करण्यास पदाधिकारी नाहीत, अशी अवस्था निर्माण झाली. जुने, निष्ठावान कार्यकर्ते अडगळीत गेले आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचे एकमेव आमदार हेमंत ओगले श्रीरामपूरमधून विजयी झाले. मात्र, ते पक्ष संघटनेत श्रीरामपूर बाहेर लक्ष देण्यास तयार नाहीत.
रिक्त झालेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जयंत वाघ यांना नियुक्त करत बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक शरद आहेर (नाशिक) यांना समवेत घेत तालुकानिहाय दौरे आयोजित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. रिक्त जागी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.
मात्र, अखिल भारतीय काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर गुजरात राज्याची निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवल्याने ते गुजरातच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यामुळे पुनर्बांधणी आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच पक्षांना त्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्ष पातळीवर जोर-बैठकांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसमध्ये मात्र अद्याप शांतता आहे. नगर शहर जिल्हाध्यक्ष, कोपरगाव तालुकाध्यक्ष यासह रिक्त जागांवर पदाधिकारी नियुक्ती रखडली गेली आहे. या नियुक्त्या केव्हा होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायतीत सत्तांतर होताना केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेसच्याही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याची कोणतीही दखल पक्ष पातळीवर घेतली गेली नाही. परिणामी कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे.