अहिल्यानगर : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या विशेष शिक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली आहे. विशेष शिक्षकांच्या या समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगरमधील विशेष शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व व्यथा मांडल्या.

भुसे यांनी या परिस्थितीची दखल घेत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. या वेळी ते म्हणाले, की शिक्षक हे समाजाच्या घडणीतील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या हक्काच्या वेतनास विलंब होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने नियोजन करून शिक्षकांना न्याय द्यावा. या वेळी त्यांनी शिक्षण सचिवांना निर्देश देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

या प्रश्नासंदर्भात माहिती देताना विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी सांगितले की, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात २९८४ विशेष शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यातील विशेष शिक्षकांची संख्या १२८ आहे. हे शिक्षक कोणतीही अपेक्षा न ठेवता दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुणवान विद्यार्थी घडत आहेत. परंतु दुर्दैवाने अद्याप त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलेली नाही. त्यांना कोणताही सन्मान दिला जात नाही. नियमित वेतनही मिळाले नसल्याने दिवाळी अंधारातच गेली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तर व जिल्हास्तरावर हेलन केलर व लुईस ब्रेल पुरस्कारांच्या नावाने विशेष शिक्षक व उत्कृष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव सादर केला. या मागणीवरही मंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

या वेळी उमेश शिंदे, अमोल पाटील, पिंटू अहिरे, विकी बडगे, सुनील अहिरे, राहुल पाटील आदींसह जिल्ह्यातील विशेष शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी वेतन विलंबाचा निषेध नोंदवला व शिक्षकांच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.