अहमदनगरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या करणारा हल्लेखोर स्वत: पोलिसांना शरण गेला. वैयक्तिक वादातून ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार संग्राम जगताप निर्दोष असून पोलीस तपासातून हे सिद्ध होईलच, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संग्राम जगताप यांची पाठराखण केली.
अहमदनगरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संग्राम जगताप यांच्या अटकेबाबत शंका उपस्थित केली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो. ज्याने दोन शिवसैनिकांची हत्या केली ती व्यक्ती स्वतः पोलिसांना शरण गेली आहे. वैयक्तिक वादातून ही हत्या केल्याचे त्याने म्हटले आहे. परंतू, अहमदनगरमध्ये असं वातावरण तयार केलं जात आहे की यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जबाबदार आहे. संग्राम जगताप हा तरुण आमदार आहे. तो निष्पाप असल्याचे तपासाअंती सिद्ध होईलच, असे त्यांनी सांगितले. सरकार अशा पद्धतीने वागून कारवाई करणार असेल तर आम्ही देखील ते सहन करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला. या घटनेनंतर शिवसेनेचे तीन – तीन मंत्री नगरमध्ये जातात आणि राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपावर आरोप करतात. राष्ट्रवादीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधून काढावेत. यासाठी सर्वांचे फोन तपासावे. तपासाअंती संग्रामचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट होईलच, असेही त्यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते असून, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची बरोबरी वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील असे वक्तव्यही त्यांनी केले.