Air India Plane Crash Latest News: अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवारी विमानातील ब्लॅक बॉक्स आढळून आला असून त्याची तपासणी सुरू आहे. दरम्यान बोईंगच्या ड्रीमलायनर विमानांची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही ड्रीमलायनर विमानांवर संशय व्यक्त केला होता. “विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात ड्रीमलायनर विमान कोसळलं”, असा प्रश्न संजय राऊत यांनी काल उपस्थित केला होता. त्यानंतर आज त्यांनी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी ब्रिटन, अमेरिकेतून काही पथके आली आहेत. तर भारताच्या केंद्रीय यंत्रणाही चौकशी करत आहेत. त्यामुळे यावर आताच कोणता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र जेव्हा बोईंग ड्रीमलायनर खरेदी संदर्भात करार करण्यात आला होता, तेव्हा भाजपाने त्यावर शंका उपस्थित केली होती. ड्रीमलायनरची क्षमता, त्याचे इंजिन याविषयी शंका उपस्थित झाल्या होत्या.

संजय राऊत पुढे म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना बोईंगची खरेदी करण्यात आली होती. आरोप झाल्यानंतर त्यांना वारंवार खुलासा करावा लागला होता.

अपघातग्रस्त विमानातील दोन्ही इंजिन एकाचवेळी कशी बंद पडली. अवघ्या ३० सेकंदात अपघात झाला कसा? हा सध्या जगभरातील उड्डाण क्षेत्राला पडलेला प्रश्न आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून सदर अपघात झाला का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तज्ज्ञ यासंबंधीचा तपास नक्कीच करतील. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर सायबर हल्ले होत आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. याचा तपास होणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात की घातपात?

अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना अपघात आहे की घातपात? यासंबंधी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, याबद्दल आताच काही विधान करून मला गोंधळ वाढवायचा नाही. आमच्याकडे विविध क्षेत्रातून माहिती येत असते. त्यानुसार पुढे भूमिका मांडू. एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा ५६ टक्के कमी मनुष्यबळ आहे. विमानतळांवर विमानाची तांत्रिक देखभाल करणाऱ्यांची तंत्रज्ञांची संख्या कमी का आहे? हा प्रश्न आहे. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.