उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जिल्हा परिषद सदस्यांची तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी बीड व परळी येथे सहाही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बठक घेऊन राष्ट्रवादी अंतर्गत डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, तरी कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे पाठच फिरवली. उपस्थित काही कार्यकर्त्यांनी पक्षानेच स्पष्ट भूमिका घ्यावी, असे मत मांडले. खासदार गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात बीडमधून उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर बैठका झाल्यानंतरही नेते आणि कार्यकर्त्यांकडे नव्हते. बीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार मदानात आणून जागा जिंकण्यासाठी मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. मुंडेंची राजकीय कोंडी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली तरी राष्ट्रवादीतून लोकसभेस उमेदवार होण्यास कोणीच तयार नसल्याचे चित्र आहे. अमरसिंह पंडित यांना विधान परिषद आमदारकीचे बक्षीस दिल्यानंतर तेच उमेदवार होतील, असे आडाखे बांधले गेले तर पुतणे धनंजय मुंडेही राष्ट्रवादीत गेल्याने त्यांनाही उमेदवार केले जाईल, असेही अंदाज होते. पण या दोन्ही आमदारांवर जिल्हा बँक प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने ते अडचणीत आले आहेत.
 मागील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, आमदार आणि दोन्ही मंत्री या सर्वाची पुणे येथे बठक घेऊन लोकांची कामे करा, आपसात समन्वय ठेवा, कामे होत नसतील तर राजीनामे द्या, असा दम भरला. दोन्ही मंत्र्यांनी दरमहा बठक घेऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे बजावत पदाधिकाऱ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक सदस्यांनी निधी मिळत नसल्याने कामे कशी करायची, असा मुद्दा उपस्थित करून नाराजीला वाट मोकळी केली. पवार यांच्या पाठोपाठ दोन दिवस जिल्हय़ात मुक्काम टाकून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी बीड येथे तीन मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बठक घेतली. मात्र, या मतदारसंघाच्या आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही बठकीकडे पाठ फिरवली.