Ajit Pawar Critisice Rohit Pawar : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून काढता पाय घेतला. भाजपाचे वरिष्ठ सत्तास्थापनेबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. दरम्यान, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवा या मागणीलाही आता जोर येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केल आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते काल (२७ नोव्हेंबर) रात्री माध्यमांशी बोलत होते.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“मुख्यमंत्रीपद अजित पवारांना दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही त्या गोष्टीचं स्वागत करू. अभिनंदन करू. पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखत असाल तर भाजपा अजित पवारांना सहजपणे मुख्यमंत्री बनवणार नाहीत”, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांचं प्रत्युत्तर काय?

“बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. आम्ही, आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते, सर्व आमदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष खंबीर आहेत. ज्याने त्याने आपलंआपलं पाहावं”, अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली.

u

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, असे संकेत

सरकार स्थापण्यात आपला कोणताही अडसर असणार नाही आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट करीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शर्यतीतून एक प्रकारे माघारच घेतली. यामुळे आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर गुरुवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री व सत्तावाटपावर निर्णय घेण्यात येणार आहे. या साऱ्या घडामोडींनुसार देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा >> Aditi Tatkare : मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा, आता मंत्रिपदाकडे लक्ष; आदिती तटकरे म्हणाल्या…

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला तरी बुधवारी दुपारपर्यंत नवीन सरकार स्थापण्यासाठी महायुतीत काहीच हालचाली दिसत नव्हत्या. मात्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल, असे जाहीर केल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसांनंतर मौन सोडले. मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, यासाठी शिंदे यांनी गेले दोन दिवस प्रयत्न केले होते. पण १३२ जागा जिंकल्याने भाजपाने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असे संकेत मंगळवारीच दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा सूर काहीसा नरमला होता. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही सौम्य झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.