शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर विरोधक यांनी आज बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पक्की असल्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळही जाहीर केली. मला एकनाथ शिंदे यांनी पक्षातून काढून टाकले तरी मी निवडणूक लढविणारच असा पवित्रा घेतल्यानंतर आता अजित पवार गटही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभेत असहकार करण्याची भाषा वापरली होती. मात्र आता मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

शिवतारेंची हकालपट्टी करा अन्यथा…

द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, “आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”

भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी होतेय? पाच खासदारांचं तिकीट कापण्यावर संजय शिरसाट म्हणाले…

महायुतीच्या मतदानावर परिणाम होणार

उमेश पाटील पुढे म्हणाले की, आम्ही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे मांडले आहे. मात्र त्यानंतरही शिवसेनेकडून शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीत राहावे की नाही? याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. आता शिवतारे यांचे वर्तन सहन करण्यापलीकडे गेले आहे. आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही. शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. ज्याचा फटका सरतेशेवटी महायुतीच्या मतदानावर होईल. त्यामुळे शिंदे यांनी शिवतारे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी माची मागणी आहे.

विजय शिवतारे १२ एप्रिल रोजी अर्ज भरणार

दरम्यान विजय शिवतारे यांनी आज सासवड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी १ एप्रिल रोजी आम्ही प्रचाराला सुरुवात करत निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले. “कुणाला पराभूत करण्यासाठी नाही तर घराणेशाही आणि झुंडशाही संपविण्यासाठी ही लढाई लढणार आहे. १ एप्रिलला माऊलींच्या पालखी तळावर कमीत कमी ५० ते ६० हजारांची मोठी सभा घेणार आहे. माझ्याकडे कोणताही पक्ष नाही, माझ्याकडे फक्त सर्वसामान्य जनता आहे. पाचही विधानसभा मतदारसंघात अशा सभा घेतल्या जातील. १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाशवी शक्तीचे १२ वाजविणार”, असे विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे.

बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “१२ तारखेला १२ वाजता…”

शिवतारेंनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी

विजय शिवतारे यांच्या या भूमिकेवर शिंदे गटानेही टीका केलेली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, विजय शिवतारे यांची पक्षाकडून समजूत काढण्यात आलेली आहे. मात्र तरीही ते हट्टाला पेटले असतील तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल निवडणूक लढवावी. जर ते शिवसेनेतून बाहेर पडून निवडणूक लढविणार असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही.