नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून निश्चित झालेली बैठक सलग दुसऱ्यांदा बारगळली. ही बैठक बुधवारी मंत्रालयात होणार होती; पण ती रद्द झाल्याचा निरोप संबंधितांना बैठकीपूर्वी देण्यात आला, तर या बैठकीवर भाजपच्या एका आमदाराने तीव्र शब्दांत आपली हरकत नोंदविली.
आपल्या पक्षाच्या विस्ताराच्या निमित्ताने मागील काही महिन्यांत सातत्याने नांदेडमध्ये आलेल्या पवार यांच्याकडे त्यांच्या पक्षाच्या आजी-माजी आमदारांनी वेगवेगळ्या मागण्यांची जंत्री सादर केली होती. त्याची सत्वर नोंद घेत पवार यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सर्व संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची बैठक १४ मे रोजी मुंबईत आयोजित केली होती; पण ती शेवटच्या क्षणी रद्द झाली.
वरील बैठकीला नांदेडमधून जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार हे दोन्ही निमंत्रित मुंबईला गेले होते. या बैठकीच्या निमंत्रितांची यादी बाहेर आली तेव्हा त्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नावे नसल्याचे पाहून भाजपच्या दोन आमदारांनी आश्चर्य व्यक्त केले. नांदेड जिल्ह्याशी संबंधित सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या खासदार अशोक चव्हाण यांनाही ‘चकवा’ देत पवार यांनी बैठकीचा घाट घातला होता. पण त्यांनी त्यावर कुठलेही भाष्य केले नव्हते.
पहिली बैठक रद्द झाल्यानंतर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते ही बैठक लवकर घ्या, असे पवार यांना कळवत होते. त्यानुसार बुधवारच्या (दि. २८) बैठकीची सूचना जारी झाली होती. पण पवार यांच्यासमोर इतर महत्त्वाचे विषय आल्यामुळे दुसऱ्यांदा ठरलेली बैठकही ऐनवेळी रद्द झाली. या दुसऱ्या बैठकीसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटेही त्यांच्यासोबत मुंबईतच होते. पण वरील बैठकीसमोर मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या कामाचा विषय असतानाही मुखेडचे आमदार तुषार राठोड यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले नव्हते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाजपच्या एका आमदाराने तक्रार केल्याची बाब दोन दिवसांनंतर बाहेर आली. त्यावर शहा काय म्हणाले होते, हेही बाहेर आले. याच आमदाराने वरील बैठकीवर हरकत घेतली, असे येथे समजले.
घाटे यांच्या प्रस्तावाला भाजपचा विरोध
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात पूर्वीच दाखल झालेले माजी आमदार अविनाश घाटे यांनी पवार यांच्या मागील मुखेड दौऱ्यात आपल्या सुतगिरणीच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन घाईघाईमध्ये उरकून घेतले. या सुतगिरणीमध्ये नवीन यंत्रसामग्री बसवून प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांनी शासनाकडे २३ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. तो मार्गी लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण भाजपचा या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगण्यात आले.