Ajit Pawar Remark on Reservation Based on Economic Criteria : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यानंतर त्यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा स्वीकार केला असून त्यातील नोंदींनुसार मराठा समाजातीत कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. तसेच त्यांच्या नात्यागोत्यातील लोकांना प्रतिज्ञापत्राच्या सहाय्याने कुणबी दाखले दिले जाणार आहेत. याला आबोसी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार हे यामध्ये आघाडीवर आहेत.

दरम्यान, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “मित्रांनो जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करू नका, मी राजकारण करत असताना कधी जात-पात, नातंगोतं बघत नाही. मी केवळ माणूस बघतो आणि त्याची मदत करतो. काही लोक वेगळ्या पद्धतीने जातीचे खूळ डोक्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते करत असताना त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना, बारा बलुतेदारांना आपल्याबरोबर घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. त्याच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन आपण पुढे गेलो तरच आपलं भलं होईल ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. कोणी काही चुकीचं खूळ डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगा आपण सगळी हाडामासाची माणसं आहोत. सगळ्यांचं रक्त लाल आहे. कशाला जातीच्या भानगडीत पडता? जातीचं राजकारण करणाऱ्यांना सांगा जातीबद्दल कशाला सांगतोस?”

आरक्षणाबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

उपमुख्यमंत्री म्हणाले, “जातीबद्दल बोलायचं झाल्यास प्रत्येकाला आदर मिळायला हवा. ज्याला त्याला, ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे किंवा एकंदरीतच त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण मिळायला हवं यात आमचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु, यात कोणी राजकारण करत असेल तर त्याला आवर घालायला पाहिजे. कृपा करून अशा लोकांना आवर घाला, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे.”